कॉफीशॉप
(मामू)
बीजिंगनगरीत ऑलिंपिकचं भव्य, नेत्रदीपक, अनुपम, अद्भुत उद्घाटन पाहिल्यानंतर चि. राहुल आणि चि. सौ. प्रियांकाताईनं अख्खा चीनच पाहण्याचा हट्ट आईकडं धरला. मातृहृदयच ते! तिनं लगेच लेकरांचा हट्ट पुरवायचं कबूल केलं. तिघंही गेले चीनच्या ग्रेट वॉलवर! “वॉव’ असा उद्गार काढून मुलं आईला म्हणाली, “”आई, आई… आपल्याकडं एवढी मोठी भिंत का नाही?” ……..
तेवढ्यात आवाज आला, “”नारायण… नारायण…”
आई एकदम दचकली. तिला वाटलं, इथंही आले की काय मागं मागं? पण पाहते तो साक्षात नारदमुनी! “हुश्श’ करून आई म्हणाली, “”तुम्ही होय… बरं झालं! वेळेवर आलात! आता द्या आमच्या मुलांना उत्तरं…” मुनी म्हणाले, “”अरे, कोण म्हणतं तुमच्याकडं भिंत नाही? राज्या-राज्यात, प्रांता-प्रांतात, धर्मा-धर्मांत केवढ्या भिंती आहेत. त्यापुढं ही भिंत काहीच नाही…”
मग नारद सर्वांना घेऊन शांघायमध्ये आले. ते अजस्त्र शहर पाहून मुलं म्हणाली, “”आई, आई, आपल्याकडं असं शहर का नाही?” आईनं मुनींकडं कटाक्ष टाकला. ते म्हणाले, “”अरे, तुम्ही मुंबईचं हे करणारच आहात. शिवाय आत्ता नसलं म्हणून काय झालं? तुमच्या राजधानीतली अतिक्रमणं हटवायचा विषय आला, की सर्वोच्च न्यायालयदेखील म्हणतं, साक्षात नारायण, म्हणजे परमेश्वर आला तरी काही सुधारणा होण्याची शक्यता नाही. असं तुमचं नगर नियोजन! मागं आमचे विष्णूमहाराज असंच गरुडावरून फिरत फिरत मुंबईत आले… तर असे टरकले, की पुन्हा नाव नाही काढलं मुंबईचं! कुठली तरी खडाजंगी ऐकली बहुतेक त्यांनी.”
प्रियांकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतं. राहुलला अधूनमधून “कलावती’ आठवत होती. बीजिंगमधलं ऑलिंपिक व्हिलेज, “बर्डस नेस्ट’ आणि ऑलिपिंक ग्रीन हे सगळं वैभव पाहिल्यावर राहुलला राहवेना. चीनच्या प्रगतीचं रहस्य त्याला अस्वस्थ करीत होतं. त्यानं तिथं कचरा साफ करणाऱ्या माणसाला विचारलं, तर तो त्याचे मिचमिचे डोळे आणखी मिचमिचवून “थॅंक्यू’ म्हणाला. नारद हसून म्हणाले, “”त्याला “वेलकम’ आणि “थॅंक्यू’ एवढंच इंग्रजी येतं. तो पदवीधर तरुण आहे. हौस म्हणून हे काम करतोय ऑलिंपिकच्या काळात…” मग मुनी त्या सगळ्यांना घेऊन एका शाळेत गेले. मुलं “एकसाथ नमस्ते’ला मॅंडरिन भाषेत जे काय म्हणतात, ते म्हणाली. इतिहासाचा तास सुरू होता. राहुलनं गुरुजींना विचारलं, “”इतिहास का शिकवता?” गुरुजी म्हणाले, “”ज्यांना उज्ज्वल इतिहास असतो, तेच उज्ज्वल भविष्यकाळ घडवू शकतात…” ते भव्य स्टेडियम, त्या लाल-पिवळ्या गर्द छटा सगळं राहुलभोवती फिरू लागलं… जाग आली तेव्हा विमान दिल्लीत लॅंड होत होतं… खिडकीतून “यमुने’चं दर्शन होताच “ये जो देस है मेरा… स्वदेस है मेरा’ हे रेहमानचे शब्द कानी घुमू लागले… शेजारून पुन्हा आवाज आला, “”नारायण… नारायण…” राहुल डोळे चोळत पाहू लागला, तसे नारदमुनी हसत म्हणाले, “”ड्रॅगनला गाठायचं, तर हिमालय ओलांडण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेव…”
- मामू




तुमचा अभिप्राय नोंदवा