फेरीवाल्यांना ओळखपत्रे
फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय केंदाने घेतला असून फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.
फेरीवाल्यांना प्रामाणिकपणे व्यवसाय करता यावा आणि ग्राहकांसाठी अधिक सोयीस्कर व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी ही सुधारणा करण्यात येणार आहे. फेरीवाल्यांच्या नियमनासाठी शहर फेरीवाला समितीची स्थापना करण्यात येणार आहे. शहराच्या नियोजनात फेरीवाले दुर्लक्षित राहिल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी ही समिती प्रयत्न करेल. फेरीवाल्यांच्या व्यवसायावर कालावधी आणि क्षेत्राच्या मर्यादा घालण्यात येणार नाहीत. मात्र नोंदणी बंधनकारक ठरणार आहे.
अतिक्रमणे हटविताना आधी फेरीवाल्यांना नोटीस देण्यात येईल. त्यानंतर जागा रिकामी न केल्यास दंड ठोठावण्यात येईल आणि त्यानंतरही फेरीवाल्याने जागा सोडली नाही तरच त्याचे अतिक्रमण हटविण्यात येईल. जप्त करण्यात आलेल्या वस्तू योग्य ते शुल्क भरल्यानंतर परत करण्यात येतील. एका सवेर्क्षणानुसार देशात सुमारे एक कोटी फेरीवाले आहेत. त्यापैकी मुंबईत सर्वात अधिक दोन लाख ५० हजार तर दिल्लीत दोन लाख फेरीवाले आहेत. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे.
( वृत्तसंस्था)




Leave a Reply