अभिनय नको, गाणं हवं गाणं!
टीव्हीचं रंगभूमीवर आक्रमण झाल्याची ओरड सुरू होऊन जमाना झाला, पण या हल्ल्यात रंगभूमीने काय काय गमावलंय ते आत्ता आत्ता कळतंय. नाटकाचा स्त्री प्रेक्षक टीव्हीने पळवला, हा आक्रमणाचा पहिला तडक परिणाम. बायका येईनात म्हणून नवरे येईनात आणि सहकुटुंब नाटक पाहण्याची प्रथा हळुहळू बंद पडली. त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटकं बंद झाली.
नाटकाकडे टाइमपास म्हणून येणाऱ्या महाभागांना नाटकांच्या सीड्या सस्त्या दामात मिळू लागल्यावर तेही घरच्याघरी त्यांचा आस्वाद घेऊ लागले. दुसरा परिणाम नामवंत नट टीव्हीने पळवले किंवा जे तिकडे गेले त्यांना नामवंत करून टाकले. त्यामुळे हयात नाटकात घालवलेल्या नटांचं ग्लॅमर कालपरवाचे टीव्हीस्टार घेऊ लागले. नाटक करायचं तर टीव्हीवर चमकलेले नटनट्या हवेत, अशी एक घातक प्रथा रंगभूमीवर सुरू झाली. पुढे टीव्ही सिरियल्सची गरज इतकी वाढली की अख्खी रंगभूमी मालिकांच्या सेटवर सापडू लागली. दुय्यम आणि तिय्यम भूमिकांसाठीही नाटकांना आता कलावंत सापडेनासे झाले.
आणि आता ताजा धक्का. ‘सा रे ग म प’ आणि ‘अजिंक्यतारा’ या म्युझिकल कॉन्टेस्ट्सनी दिलेला. गेल्या काही वर्षांत टीव्हीवर अंताक्षरी छापाच्या सुरू असलेल्या संगीत स्पर्धांनी, एसएमएस पोल्सनी आणि त्यासाठीच्या कॅम्पेन्सनी जी गाण्यांची साथ आणली तिची लागण मराठी चॅनल्सनाही झाली. सा रे ग म प आणि अजिंक्यताराने मराठी गाण्यांची नवी क्रेझ पोराटोरांमध्येही निर्माण केली. परिणाम? मराठी नाट्यकलावंत रंगभूमीवर अभिनय करायचा सोडून हातात माईक घेऊन गात सुटलेत. आईशप्पत! प्रसाद ओक अजिंक्यतारा झाला काय आणि सुमीत राघवन उपतारा झाला काय, अनेक कार्यक्रम निर्मात्यांना अलीबाबाच्या गुहेतल्या सोन्याच्या चीपा दिसायला लाागल्यायत. प्रसाद ओक, सुनील बवेर्, सुमीत राघवन, शैलेश दातार, भारती आचरेकर, वंदना गुप्ते, प्रशांत दामले, पुष्कर श्ाोत्री अशा गाता येणाऱ्या, गाऊ शकणाऱ्या कलावंतांना मागणी यायला सुरुवात झालीय. त्यांना घेऊन कार्यक्रमांच्या संकल्पना आखल्या जायला लागल्या आहेत. आणि नाटकबाजारातली आत्ताची खबर अशी आहे की नाटकांपेक्षा गाण्यांच्या कार्यक्रमांना (नाट्य कलावंत नसलेल्याही) बेफाट बुकिंग होतंय. त्यामुळे यापुढचा काळ गाण्यांच्या कार्यक्रमांचा असणार आहे.
या (नाटकांच्यादृष्टीने) वाईटातून झालंच चांगलं तर एवढंच होईल की, संगीत रंगभूमीच्या अस्ताबरोबर नष्टप्राय झालेली ‘गायक-नट’ ही प्रजाती पुन्हा जन्म घेईल आणि संगीत नाटकांचा याने की म्युझिकल्सचा जमाना रंगभूमीवर पुनश्च सुरू होईल.




तुमचा अभिप्राय नोंदवा